’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी   

निवृत्त अमेरिकन लष्करी अधिकारी जॉन स्पेन्सर यांचे मत

वॉशिंग्टन : निवृत्त अमेरिकन लष्करी अधिकारी, आधुनिक युगातील युद्धजन्य परिस्थितीचे विश्लेषक आणि लेखक जॉन स्पेन्सर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे तोंडभरून कौतुक केले आहे. केवळ चार दिवसांच्या सुनियोजित लष्करी कारवाईनंतर भारताने निर्णायक विजय मिळवला आहे. दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे, लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण दृढपणे राबवणे यात भारत पूर्णपणे यशस्वी झाला आहे. ’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ठरवलेल्यापेक्षा जास्त यश मिळवले आहे, असे स्पेन्सर यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
जॉन स्पेन्सर यांनी अमेरिकन सैन्यात काम केले आहे. इराक युद्धात दोनदा त्यांचा सहभाग होता. रेंजर स्कूलसारख्या संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. संरक्षण रणनीतीची सखोल समज असलेल्यांमध्ये त्यांचे विश्लेषण महत्त्वाचे मानले जाते.

भारताच्या हवाई दलाने सामर्थ्यशाली चमक दाखवली

फक्त चार दिवसांच्या कॅलिब्रेटेड लष्करी कारवाईनंतर हे वस्तुनिष्ठपणे निर्णायक ठरते, की भारताने मोठा विजय मिळवला. ऑपरेशन सिंदूरने त्यांची धोरणात्मक उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. भारताने ठरवल्यापेक्षा जास्त यश मिळवले आहे. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे, लष्करी श्रेष्ठता प्रदर्शित करणे आणि एक नवीन राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही प्रतीकात्मक शक्ती नव्हती, ही निर्णायक शक्ती होती, ज्याची स्पष्टपणे यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली, असे स्पेन्सर त्यांनी लिहिले आहे.

जॉन स्पेन्सर यांच्या मते, हे चार परिणाम साध्य झाले...

एक नवीन सीमारेषा आखली गेली आणि अंमलातही आणली गेली : पाकिस्तानी भूमीवरून होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांना लष्करी बळाचा वापर करून तोंड देण्यात आले. ही केवळ धमकी उरली नाही, तर एक नवे उदाहरण सेट झाले.     
 
लष्करी सामर्थ्याची श्रेष्ठता  : भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळे, ड्रोन सेंटर्स आणि हवाई तळ असे कोणत्याही लक्ष्यावर इच्छेनुसार हल्ला करण्याची क्षमता दाखवली. याउलट, पाकिस्तान भारतातील एकाही सुरक्षित व प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू शकला नाही. 
 
नियंत्रणाची क्षमता : भारताने जोरदारपणे प्रत्युत्तर दिले; परंतु पूर्ण युद्ध छेडण्यापूर्वी हल्ले थांबवले. नियंत्रित वाढत्या हल्ल्याने एक स्पष्ट प्रतिबंधक संकेत मिळाला, की भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि त्याचा वेग भारताच्या नियंत्रणात असेल.
 
धोरणात्मक स्वातंत्र्याचा दावा : भारताने आंतरराष्ट्रीय मध्यस्थी न घेता हे संकट हाताळले. सार्वभौम मार्गांचा वापर करून आपल्या अटी-शर्तींवर भारताने या गोष्टींवर विजय मिळवला.
 

Related Articles